जळगांव जिल्हामहाराष्ट्र

बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी पत्रकार भवनात अभिवादन

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २१ फेब्रुवारी २०२५ |

बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला.केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीतर त्यांच्या अंगी असलेल्या विपुल ज्ञानाव्दारे त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व प्राप्त करताना विविध शास्त्रांचा उहापोह केला व त्या माध्यमातून समाजात पत्रकारांबरोबरच शिक्षकही घडवले.आज पत्रकारितेत स्पर्धा वाढली आहे त्यामुळे केवळ मुद्रित माध्यमावर विसंबून न राहता संपादकांनी बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी येथे केले.
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात आयोजित आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी मार्गदर्शन करतांना, ब्रिटिशकालीन पत्रकारिता, स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता व आजच्या काळातील पत्रकारितेतील अंतर स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष विजयबापू पाटील हे होते. व्यासपिठावर प्रमुख वक्ते अमळनेरचे संदीप घोरपडे, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिकाभाऊ चौधरी,कार्यवाहक अशोक भाटिया,विश्वस्त अनिल पाटील, मुकंद एडके,कार्याध्यक्ष पांडुरंग महाले आदी होते.

प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रमुख वक्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी बोलताना युवराज पाटील यांनी,भारतीय पत्रकारितेची सुरुवात,कालानुरुप त्यात होत गेलेले बदल आणि आजची स्पर्धात्मक पत्रकारिता यावर प्रकाशझोत टाकला.


पत्रकारितेचा पाया रोवला
बाळशास्त्रींनी संघर्षमय जीवनातही अनेक भाषा अवगत केल्या व त्यामाध्यमातून त्यांनी अनेक शिक्षकही घडवले.दादाभाई नवरोजी हे त्यांचे शिष्य होते….दर्पण… बरोबरच सर्व शास्त्रांचा समावेश असलेले…दिग्दर्शन…हे नियतकालिकही प्रभावीपणे चालविले.समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लेखणी झिजवली.त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार होते व त्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा पाया रोवला.स्वातंत्र्यानंतर रेडिओ क्रांती आली,नंतर दुरदर्शन आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे पसरले. आता तर फेसबुक,गुगल,इंटाग्राम आणि ट्विटर या माध्यमांतून कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती मिळू लागली आहे. या स्पर्धेतही मुद्रित माध्यमांचे महत्व कायम आहे.आजही देशात नियतकालिकांसह वर्तमानपत्रांचा खप १० कोटीच्या जवळपास आहे त्यावरुन मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता कायम असल्याचे स्पष्ट होते.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशयपूर्ण मजकूर देण्यासाठी पत्रकारांनी व्टिटरची भाषा शिकणे गरजेचे असल्याचे आवाहन युवराज पाटील यांनी केले.
पत्रकारांच्या लेखणीला धार हवी
प्रमुख वक्ते संदीप घोरपडे (अमळनेर) यांनी मार्गदर्शन करताना बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता जोपसण्यासाठी आयुष्य वेचल्याचे स्पष्ट करताना आजच्या दिशाहीन होत असलेल्या पत्रकारितेवर ताशेरे ओढले.बाळशास्त्रींना सर्व भाषा कळाल्या पण पैशाची भाषा कळाली नाही.ज्यांना पैशांची भाषा कळते,त्यांची लेखणी भलतीकडेच वळते असेही त्यांनी स्पष्ट केले.बाळशास्त्री हे पत्रकारच नव्हेतर एक दिग्गज लेखकही होते.पत्रकारांच्या लेखणीला धार असेल तर आमदार,मंत्र्यांनाही घरी बसवू शकतात,अशी स्पष्टोक्ती केली.समाजाला योग्य िदशा मिळेल यासाठी लेखणी झिजवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
विजयबापूंचा सत्कार
याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने त्यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा देताना सामाजिक,राजकीय वाटचालीचाही आढावा घेतला.
संघटकपदी सुरेश पाटील
यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरेश पाटील (यावल),अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूराव आनंदराव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला तसेच एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन,आरोग्यदूत युवराज खोखरे यांनाही सन्मािनत करण्यात आले.दिलीप शिरुडे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले तर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी विजयबापू पाटील यांच्या जीवन वाटचालीचा आढावा घेतला.भिकाभाऊ चौधरी यांनी आभार मानले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button