डिजिटल निमंत्रणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंजारी युवा संघटनेचा २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २७ : जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चिंधू लाड, रवींद्र पोळ, डॉ. विजय गरकल, डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, नशिराबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, नगरसेविका निकिता लाडवंजारी तसेच किशोर पाटील आणि देवानंद वंजारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण परिश्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मोठी स्वप्ने बाळगून यश संपादन करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
‘समाजातून शंभर तुकाराम मुंढे घडले पाहिजेत’
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत, समाजातून प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी मोठ्या संख्येने घडले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन विविध प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवावे, असे त्यांनी सांगितले.
इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी आणि खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिजिटल निमंत्रणाला समाजाचा भरघोस प्रतिसाद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड आणि प्रणाली नाईक यांनी केले. समारोपप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि समाजबांधवांचे आभार मानले. यंदा छापील निमंत्रणाऐवजी व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल निमंत्रण देण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला असून, त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी, भगवान सेनेचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणाला प्रोत्साहन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीरीत्या संपन्न झाला.






