रील बनवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव ! पाळधी येथील हृदयदावक घटना…!

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २६ ऑक्टोंबर २०२५ : मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याच्या नादात दोन तरुणांनी आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर रेल्वेगेट जवळ रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सकाळी सुमारास घडली. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद–हावडा एक्सप्रेसने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी होते. परिसरात ते दोघेही मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाचे म्हणून परिचित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीचा दिवस असल्याने हे दोघे मित्र रेल्वेगेटजवळील ट्रॅकवर रील बनवण्यासाठी गेले होते. मोबाईल ॲपवर पोस्ट करण्यासाठी आकर्षक दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत असतानाच धरणगावकडून जळगावकडे वेगाने येणारी अहमदाबाद–हावडा एक्सप्रेस त्यांच्यावर आली. रेल्वेचा वेग इतका प्रचंड होता की दोघांनाही सावरायची संधी मिळाली नाही आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या दुर्दैवी अपघातामुळे गावात शोककळा पसरली असून, दोघांच्या घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





