बहुआयामी इन्फ्रामॅन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कल्पक नेतृत्वात विकासाच्या गंगेने बदलतोय चाळीसगाव मतदारसंघाचा चेहरा-मोहरा !

आमदार मंगेशदादा चव्हाण अभिष्टचिंतन !
बहुआयामी इन्फ्रामॅन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कल्पक नेतृत्वात विकासाच्या गंगेने बदलतोय चाळीसगाव मतदारसंघाचा चेहरा-मोहरा
| लोकमाध्यम न्युज | जळगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला आज नवी दिशा आणि नवा वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण विकासाची गंगा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आणत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, निधी आणि विकासकामांचा लाभ चाळीसगावच्या जनतेला मिळवून देण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात आणि संवादात मंगेशदादा हे आवर्जून सांगतात की, “मोदीजींची प्रेरणा, फडणवीस साहेबांचे नेतृत्व आणि गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ यामुळेच चाळीसगावच्या विकासाची ही मोठी कामे करणे शक्य होत आहे.”
चाळीसगावच्या विकासाचा विचार करताना केवळ एखादा रस्ता, एखादी इमारत किंवा एखादी योजना यापुरता विचार न करता पुढील अनेक दशकांसाठी सक्षम प्रशासन, आधुनिक पायाभूत सुविधा, न्यायव्यवस्था, आरोग्यसेवा, परिवहन सुविधा, ग्रामीण विकास आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणाऱ्या सुविधा निर्माण करण्याचा व्यापक दृष्टिकोन मंगेशदादांच्या कार्यातून दिसून येतो. शहरासोबत गावागावांचा विकास, सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य आणि चाळीसगावला जिल्हास्तरीय सुविधांच्या दिशेने घेऊन जाणे, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या विकासप्रवासातील सर्वांत ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयांपैकी एक म्हणजे चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर होणे. या न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकामाची प्रक्रिया सुरू होत आहे. अनेक वर्षांपासून चाळीसगावकरांना न्यायालयीन कामांसाठी जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगावला जावे लागत होते. एखाद्या न्यायालयीन कामासाठी एका नागरिकाचा संपूर्ण दिवस, प्रवासाचा खर्च, कामधंद्याचे नुकसान आणि मानसिक-शारीरिक श्रम खर्च होत होते. आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय चाळीसगावमध्येच उपलब्ध झाल्यामुळे न्यायव्यवस्था नागरिकांच्या अधिक जवळ येणार आहे. वकील, पक्षकार, साक्षीदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

याचबरोबर चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असून त्याचा शासन निर्णय लवकरच अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध कामांसाठी चाळीसगावकरांना जळगावला जावे लागू नये, प्रशासनातील महत्त्वाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात आणि नागरिकांचा वेळ वाचावा, या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय या दोन सुविधांमुळे चाळीसगावचे प्रशासकीय महत्त्व निश्चितच वाढणार आहे.
या सुविधांचा खरा अर्थ केवळ दोन कार्यालये चाळीसगावला आली एवढाच नाही. चाळीसगावकरांचे हजारो मानवी तास, प्रवासातील श्रम आणि पैसा वाचणार आहे. जळगावला जाण्यासाठी लागणारा प्रवास, वाहनखर्च, भोजनखर्च, कामातून घ्यावी लागणारी सुट्टी आणि ये-जा करण्यात जाणारा संपूर्ण दिवस यामुळे नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. भविष्यात हीच धावपळ कमी झाल्यामुळे नागरिकांचा वाचलेला वेळ शेती, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि कुटुंबासाठी वापरता येईल. म्हणजेच प्रशासन नागरिकांच्या जवळ येण्यासोबतच कुटुंबांचे स्वास्थ्य, आर्थिक उत्पादकता आणि जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. विकासाचा हा मानवी चेहरा अत्यंत महत्त्वाचा आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती आणि १४४ गावांच्या विकासाचे केंद्र असलेल्या पंचायत समितीला आधुनिक प्रशासकीय इमारत मिळाली आहे. सुमारे ४८६४ चौरस मीटर क्षेत्रावर ९ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही इमारत अवघ्या एका वर्षात पूर्ण झाली आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार हमी, बांधकाम यांसह विविध विभागांसाठी स्वतंत्र कार्यालये, सुसज्ज सभागृह आणि प्रशिक्षण हॉल अशा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण प्रशासनाला आधुनिक स्वरूप मिळाले आहे. या इमारतीमुळे गावागावातील विकासाच्या कामांना प्रशासकीय गती मिळण्यास मदत होणार आहे.
महसूल प्रशासनाच्या दृष्टीनेही चाळीसगावमध्ये मोठा बदल घडत आहे. अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेल्या चाळीसगाव प्रांत कार्यालयाला आता स्वतःची आधुनिक वास्तू मिळाली आहे. प्रांताधिकारी कार्यालयासोबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानांचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रांताधिकारी दालन, कोर्टरूम, नायब तहसीलदार कार्यालय, भूसंपादन शाखा, प्रतीक्षागृह, महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, परिसर सुशोभीकरण आणि ध्वजारोहणाची सुविधा अशा आधुनिक सोयी येथे उपलब्ध आहेत. यामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडित दस्त नोंदणी सेवांनाही नवे बळ मिळाले आहे. वीर सावरकर चौक परिसरात उभारण्यात आलेले उपनिबंधक कार्यालय वर्ग-२ हे नागरिकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. यापूर्वी विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या या कार्यालयाला आता स्वतंत्र प्रशासकीय इमारत मिळाली आहे. दुय्यम निबंधक दालन, अँटीचेंबर, रेकॉर्ड रूम, कर्मचारी कक्ष, नागरिकांसाठी प्रतीक्षालय तसेच महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे अशा सुविधा उपलब्ध आहेत. विशेषतः रेल्वे स्थानकाच्या पलीकडील भागातील नागरिकांना दस्त नोंदणीची सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे.
आरोग्यसेवा ही विकासाची अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. कोरोना काळातील अनुभवातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १३ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीतून २५ कर्मचारी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत आवश्यक सुविधा असलेली ही निवासस्थाने तयार करण्यात आली असून पिण्याचे पाणी, हवेशीर रचना, किचन, बेडरूम आणि वृक्षारोपण यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहिल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक तत्पर आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठीही ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक निवासी इमारत उभारण्यात आली आहे. वाहनतळ, हवेशीर घरे, किचन, बेडरूम, गॅलरी आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली ही इमारत शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कर्मचारी मुख्यालयी उपलब्ध राहिल्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने मिळण्यास मदत होईल.
चाळीसगावमध्ये येणाऱ्या मंत्री, अधिकारी आणि मान्यवरांसाठी ६ कोटी ७२ लाख रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक ‘रायगड’ शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले आहे. दोन मजली या इमारतीमध्ये वातानुकूलित व्हीआयपी कक्ष, बैठक व्यवस्था, भोजन कक्ष, स्वयंपाकगृह, कर्मचारी कक्ष, १५० आसन क्षमतेचे वातानुकूलित सभागृह, चेंजिंग रूम, आकर्षक हिरवळ आणि आधुनिक फर्निचर अशा सुविधा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या स्मरणार्थ या विश्रामगृहाला ‘रायगड’ हे नाव देण्यात आले आहे.
चाळीसगावला MH-52 ही स्वतंत्र वाहन नोंदणी ओळख मिळाल्यानंतर आता २६ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या कार्यालयात परवाना, वाहन नोंदणी, फिटनेस चाचणी, प्रशिक्षण हॉल, डिजिटल सेवा, स्वयंचलित व्हेईकल टेस्टिंग सेंटर तसेच दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध होणार आहेत. यामुळे परिवहन विभागाच्या अनेक सेवा चाळीसगावमध्येच उपलब्ध होणार असून नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे.
चाळीसगावच्या विकासात पाणीप्रश्नाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गिरणा-जामदा बंधाऱ्यावरून टाकळी प्र. चा. गावासाठी २१.३२ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेमुळे गावाला शुद्ध, सुरक्षित आणि शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार आहे.
यासोबतच कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या रोहिणी व १८ गावांचा पाणीप्रश्न सोडविणे हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक काम आहे. या भागातील नागरिकांना वर्षानुवर्षे प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. विशेषतः माता-भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. त्यांच्या डोक्यावरचा हंडा हा त्यांच्या दैनंदिन जीवनातील जणू अपरिहार्य भाग बनला होता. ही परिस्थिती कायमची बदलण्याचा निर्धार करून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तब्बल ४० किलोमीटर अंतरावरील गिरणा धरणावरून थेट ७५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना या भागासाठी आणली. या योजनेमुळे या गावांना शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला असून यावर्षी भर उन्हाळ्यातदेखील या भागातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते. वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविण्याचे काम मंगेशदादांनी केले आहे. त्यामुळे या भागातील प्रत्येक माता-भगिनीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहील. ही केवळ ७५ कोटी रुपयांची योजना नाही; तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यातील पाण्यासाठी जाणारा वेळ, श्रम, चिंता आणि संघर्ष संपविणारे हे मोठे सामाजिक परिवर्तन आहे.
मंगेशदादांच्या विकासदृष्टीची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे सामाजिक विकास आणि माणुसकीची जपणूक. हजारो ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पंढरपूर वारी घडवून आणून त्यांच्या मनातील विठ्ठलदर्शनाची इच्छा पूर्ण करणारे ते आधुनिक श्रावणबाळ आहेत. तरुणांना दारू-पार्टीचे प्रलोभन न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रायगडवारी घडवून आणणारे ते युवानेतृत्व आहेत. तरुणांच्या हातात व्यसनाऐवजी इतिहास आणि संस्कार देण्याचा हा प्रयत्न आहे.
अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत दरवर्षी साडी-चोळीची भेट देणे आणि मुलींच्या लग्नासाठी २५ हजार रुपयांचा भाऊबीजेचा आहेर देणे, ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणखी एक ओळख आहे. त्यामुळे अनेक भगिनींसाठी ते आमदारापेक्षा आधी भाऊ आहेत आणि विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींसाठी मायेचे मामा आहेत. सामान्य नागरिकांना जनसंपर्क कार्यालयातून विविध सेवा उपलब्ध करून देणारे ते लोकसेवक आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, मोर्चे आणि संघर्षाच्या माध्यमातून आवाज उठविणारे आणि प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवणारे ते शेतकरीपुत्र आहेत. कोरोनाकाळात रस्त्यावर उतरून नागरिकांना जेवण, कोरोना लसी आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणारे ते लोकनायक आहेत. मुक्या जनावरांसाठी लंपी प्रतिबंधक लसीकरण आणि चाराछावण्यांच्या माध्यमातून आधार देणारे ते संवेदनशील पशुपालक आहेत.
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणाला आधार देणे, राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणे, तसेच शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून १२०० विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्याची संकल्पना मांडणे, ही विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आहे. गरीब रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून देणारे ते आरोग्यदूत आहेत. शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी शहीद स्मारकांना मंजुरी मिळवून देणारे ते संवेदनशील देशभक्त आहेत.
गावागावात रस्ते, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये, तलाठी कार्यालये आणि विविध विकासकामे मंजूर करून पूर्णत्वाकडे नेण्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्ता आणि चाळीसगावकराच्या शुभकार्याच्या प्रसंगी श्रीहरी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन विठ्ठलभक्ती घराघरात पोहोचविणारे मंगेशदादा हे विठ्ठलभक्त वारकरीपुत्र म्हणूनही आपले नाते जपतात.
आज या सर्व विकासकामांकडे एकत्रितपणे पाहिले तर चाळीसगावचा विकास हा केवळ रस्ते, इमारती आणि योजनांचा विषय राहिलेला नाही. चाळीसगावला सक्षम प्रशासकीय केंद्र बनविणे, न्यायव्यवस्था जवळ आणणे, जिल्हास्तरीय सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य व्यवस्था बळकट करणे, परिवहन सुविधा निर्माण करणे, गावागावात शाश्वत पाणी पोहोचविणे आणि सामाजिक जीवनमान उंचावणे, या सर्वांचा एकत्रित प्रयत्न सुरू आहे.
यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या विकासाचा थेट फायदा सामान्य नागरिकाच्या वेळेला आणि आयुष्याला होत आहे. जळगावला जाण्यासाठी लागणारे तास वाचतील, प्रवासाचा खर्च वाचेल, कामाचा दिवस वाचेल, कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ कमी होईल. पाण्यासाठी महिलांचा जाणारा वेळ आणि श्रम वाचतील. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी उपलब्ध राहिल्याने उपचाराची तत्परता वाढेल. RTOच्या कामांसाठी दूर जावे लागणार नाही. महसूल आणि दस्त नोंदणीच्या सेवा अधिक जवळ येतील. म्हणजेच विकासाच्या प्रत्येक कामामागे सामान्य माणसाचे जीवन अधिक सुलभ करण्याचा विचार आहे.
चाळीसगावच्या विकासाची ही वाटचाल एका दिवसात झालेली नाही. त्यामागे सातत्यपूर्ण पाठपुरावा, शासनाच्या विविध स्तरांशी समन्वय, निधीसाठी केलेले प्रयत्न आणि विकासाची स्पष्ट दृष्टी आहे. आणि म्हणूनच आमदार मंगेशदादा चव्हाण आपल्या कार्याचे श्रेय घेताना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे नेतृत्व आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे भक्कम पाठबळ व मार्गदर्शन यांचा आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे चाळीसगावसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि महत्त्वाच्या सुविधा आणणे शक्य होत असल्याचे ते सातत्याने सांगतात.
एकेकाळी जिल्हास्तरीय कामांसाठी जळगावकडे पाहणारा चाळीसगाव आज स्वतःच्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षमतेकडे वाटचाल करत आहे. आधुनिक पंचायत समिती, स्वतःची प्रांत कार्यालयाची वास्तू, उपनिबंधक कार्यालय, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थाने, सार्वजनिक बांधकाम विभागाची निवासस्थाने, ‘रायगड’ शासकीय विश्रामगृह, अत्याधुनिक RTO कार्यालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि गावागावातील पाणीपुरवठा योजना—या सर्व विकासकामांची मालिका चाळीसगावच्या बदलत्या चेहऱ्याची साक्ष देत आहे.
म्हणूनच आज चाळीसगावच्या विकासाकडे पाहताना ही केवळ विकासकामांची यादी नाही, तर एका बदलत्या मतदारसंघाची कहाणी आहे. प्रशासन नागरिकांच्या जवळ येत आहे, न्यायव्यवस्था जवळ येत आहे, पाणी घराजवळ येत आहे, आरोग्यसेवा सक्षम होत आहे, परिवहन सुविधा उपलब्ध होत आहेत आणि गावागावात विकासाची पाऊलवाट तयार होत आहे.
चाळीसगाव बदलत आहे…
चाळीसगाव पुढे जात आहे…
चाळीसगावचा चेहरा-मोहरा बदलत आहे…
आणि या परिवर्तनाच्या वाटचालीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे नेतृत्व, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे भक्कम पाठबळ आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
ही विकासाची गंगा अशीच अविरत वाहत राहो, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणखी वेगाने होत राहो आणि प्रत्येक चाळीसगावकराच्या जीवनात या विकासाचा प्रत्यक्ष लाभ पोहोचो, हीच अपेक्षा!
चाळीसगावच्या विकासाचा नवा अध्याय…
विकासाच्या गंगेचा अखंड प्रवाह…
आणि सक्षम, सुंदर, स्वयंपूर्ण चाळीसगावच्या निर्मितीकडे दमदार वाटचाल!
अमित एकनाथ पाटील, जळगाव.






