जळगाव शहरात विनापरवाना आणि अवैध मार्गाने बांगलादेशी तरुणीचे वास्तव्य; आश्रय देणाऱ्याला अटक, शनिपेठ पोलिसांची कारवाई

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. ११ मे – जळगांव शहरात विनापरवाना आणि अवैध मार्गाने वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या स्थानिक व्यक्तीलाही अटक केली आहे.
गुप्त माहितीवरून जोशी पेठेत छापा
शनिपेठ पोलिसांना जोशी पेठेतील भोई गल्ली परिसरात एक परदेशी महिला अवैधपणे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला मिळून आली.दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर लग्नासाठी कोणीका हिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात धक्कादायक खुलासे
पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, कोणीका राय हिच्याकडे भारतात वास्तव्यासाठी कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. ती अवैध मार्गाने सीमा ओलांडून भारतात शिरली आणि गेल्या काही काळापासून जळगावात ओळख लपवून राहत होती, असे तपासात समोर आले आहे.
केवळ महिलेवरच नाही, तर तिला माहिती असूनही आश्रय देणाऱ्या चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परदेशी नागरिकाला बेकायदेशीरपणे लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत. दरम्यान, जळगाव पोलिसांकडून अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर कठोर नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






