जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन
प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि. २ मे : (प्रतिनिधी) –वाणीभूषण, संस्कार भारती परमपूज्य प्रितीसुधाजी म.सा. यांचे १ मे रोजी पहाटे पुण्यात समाधीमरण झाले. त्यांचे अंत्यसंस्कार लोणीकंद येथे दुपारी करण्यात आले. आपल्या प्रभावशाली प्रवचन, संस्कारशाळा आणि विविध धार्मिक अनुष्ठानांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्या देवलोकगमनाने महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्त्वाचा तारा निखळल्याचे दु:ख भाविकांमध्ये आहे. त्यांचा दीक्षाकाळ हा ६५ वर्षांचा होता. त्या बाल ब्रम्हचारी होत. त्यांचे संपूर्ण जीवन संस्कार, संयम आणि साधनेचे प्रेरणा स्त्रोत होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विचरण झाले. जळगाव ला त्या चार ते पाच वेळा आल्या होत्या. त्यांच्या वाणीने प्रभावीत होऊन अनेकांनी शाकाहार अंगिकारला. त्यांच्या मराठी भजनांना श्रद्धांळूंची पसंती असायची.
जळगाव येथील आर. सी. बाफना जैन स्वाध्याय भवन येथे श्रमण संघीय आचार्य आनंद ऋषीजी म.सा. यांच्या सुशिष्या प.पू. प्रितीसुधाजी प्रती श्रद्धाभाव अर्पण करण्यासाठी श्रमण संघिय प्रवर्तक प.पू. प्रकाश मुनीजी यांच्या आज्ञानुवर्ती प.पू. धर्मलताजी म.सा. आदी ठाणा-३ यांच्या उपस्थितीत गुणानूवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवेळी सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनतारा बाफना, कस्तुरचंद बाफना, विजयराज कोटेच्या, भवरलाल संघवी, राजेंद्र लुंकड, दिलीप गांधी, विजय चोरडिया, अनिल कोठारी, नगरसेवक अमर जैन, स्वरूपकुमार लुंकड, नंदलाल गादिया, शांतीलाल बिनायक्या, संध्या कांकरिया, सुनील जैन, श्रेयेस कुमट, नितीन चोपडा, अनिल शिसोदिया, संजय रेदासनी, नरेंद्र बंब, संदीप रेदासनी, सुनील श्रीश्रीमाळ, आदी समाजबांधव उपस्थित होते. ताराबाई डाकलिया, रसिला बरडिया, प्रकाश सिंघवी, दीपा कांकरिया, स्विटी देसर्डा यांच्यासह मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला.
प्रत्येक प्रवचनातून माणुसकी, सदाचाराचा संदेश – अशोक जैन
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले की, ‘वाणीभूषण पूज्यश्री प्रीतिसुधाजी म.सा. यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे करुणा, साधेपणा आणि आत्मोन्नतीचा अखंड प्रवाह होता. त्या केवळ जैन धर्माच्या मर्यादेत न राहता सर्व समाजासाठी प्रेरणास्थान बनल्या. त्यांच्या प्रत्येक प्रवचनातून माणुसकी, सदाचार आणि व्यसनमुक्त जीवनाचा सशक्त संदेश मिळत असे. त्यांच्या ओजस्वी वाणीने अनेकांचे जीवन बदलले, तर त्यांच्या रसाळ भजनांनी मनाला शांतता आणि दिशा दिली. ‘संस्कार भारती’ ही उपाधी त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे, कारण त्यांनी असंख्य हृदयांत संस्कारांची ज्योत प्रज्वलित केली. जळगाव परिसरात त्यांनी केलेले आगमन हे अनेकांसाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी दिलेली जीवनदृष्टी सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस हृदयपूर्वक त्रिवार वंदन… त्यांचे कार्य आणि संस्कार हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’
संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ – दलिचंदजी जैन
सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘पूज्य प्रितीसुधाजी म.सा. यांचे व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ होते. त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने, प्रभावी संवादशैलीने आणि मधुर कंठाने त्यांनी असंख्य हृदयांवर अधिराज्य गाजवले. त्यांनी दिलेली बंधुभाव, नैतिकता आणि सदाचाराची शिकवण आजही समाजाला दिशा देणारी आहे. सत्तरच्या दशकातील चार कंदील चौकातील त्यांचे ते अविस्मरणीय जाहीर प्रवचन आणि “ये रे ये रे भाऊराया… भाऊबीजेला…” हे भजन आजही हजारो भाविकांच्या स्मरणात जिवंत आहे, ते केवळ गाणे नव्हते, तर समाजाला एकत्र आणणारा स्नेहबंध होता. त्यांच्या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. त्यांच्या शिकवणीचे आचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’






