आषाढी वारीच्या निमित्ताने शुक्रवारी जळगावकरांसाठी परिवर्तन निर्मित ‘पालखी’ नाटकाचा विशेष प्रयोग !

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि.२३ : आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त जळगावकरांना वारकरी परंपरेचा भावस्पर्शी अनुभव देणारा परिवर्तन निर्मित ‘पालखी’ या गाजलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी रात्री ८ वा. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे सादर होणार आहे.
साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, समता, माणुसकी आणि वारीचे आध्यात्मिक सौंदर्य प्रभावी नाट्यमाध्यमातून उलगडणारे हे नाटक प्रेक्षकांना भावविश्वात घेऊन जाते.
‘पालखी’ या नाटकाचे प्रयोग यापूर्वी मुंबई, कलकत्ता तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये यशस्वीरीत्या सादर झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता आषाढी वारीच्या निमित्ताने जळगावकरांनाही हा अविस्मरणीय नाट्यअनुभव घेता यावा, या उद्देशाने अनिशभाई शाह, अनिलभाई कांकरिया, किरण बच्छाव, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबीराज राणे व नारायण बाविस्कर यांच्या संकल्पनेतून हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
सुमारे ४५ कलावंतांचा सहभाग असलेल्या या भव्य नाट्यप्रयोगात वारकरी परंपरेचे वैभव, विठ्ठलभक्तीची अनुभूती, अभंग, कीर्तन आणि भावविश्व यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. परिवर्तन निर्मित हा नाट्यप्रयोग भक्ती, संस्कृती आणि रंगभूमी यांचे अनोखे दर्शन घडवणारा ठरतो.
या नाटकात मंजुषा भिडे, वसंत गायकवाड, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, अक्षय नेहे, नेहा पवार, श्वेतांबरी गरुड, हर्षल पाटील यांच्यासह एकूण सुमारे ४५ कलाकार भूमिका साकारत आहेत.
हा प्रयोग जळगावकरांसाठी खुला असून प्रवेशिका आहेत. त्यासाठी अक्षय नेहे (77982 66875 ) यांच्याशी संपर्क साधावा. आषाढी वारीच्या पावन वातावरणात भक्ती, संस्कृती आणि नाट्यकलेचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिवर्तन संस्थेच्यावतीने डॉ. किशोर पवार, डॉ. मनोज पाटील, लीना लेले, सुनील बारी, आदींनी केले आहे.






