महापौरपदी दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी मनोज चौधरींची बिनविरोध निवड
मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ३ फेब्रुवारी २०२६ : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, महायुतीने अत्यंत गुप्तता पाळत अखेर महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी महापौरपदासाठी दीपमाला मनोज काळे आणि उपमहापौरपदासाठी मनोज सुरेश चौधरी यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.येत्या ६ फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष महासभेत यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होणार आहे.
महायुतीचे भक्कम संख्याबळ
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने ४६ जागा जिंकून महापालिकेत आपले वर्चस्व राखले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ७० वर पोहोचले आहे. या मजबूत बहुमतामुळे महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार हे आधीच निश्चित झाले होते. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुतीकडून केवळ दोनच अर्ज आल्याने ही प्रक्रिया आता केवळ औपचारिक उरली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
दीपमाला काळे आणि मनोज चौधरी यांनी अर्ज दाखल करताना आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेविका शुचिता हाडा, अमर जैन, शाम कोगटा यांच्यासह महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत जल्लोष केला.
इच्छुकांच्या नाराजीवर फुंकर
महापौरपदासाठी अनेक जण इच्छुक असताना, दीपमाला काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाने ज्येष्ठतेला प्राधान्य दिले आहे. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, सध्या संधी न मिळालेल्या नगरसेवकांना पुढील टप्प्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. यामुळे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून करण्यात आला आहे.
विकासाचा नवा अध्याय
“नगरसेवकांनी आपापसातील गटतट आणि मतभेद विसरून जळगावच्या विकासाचा गाडा पुढे न्यावा,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर “एकजुटीने काम केल्यास जळगावचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे,” असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. दीपमाला काळे यांच्या रूपाने एक अनुभवी नेतृत्व शहराला लाभल्याने रखडलेल्या विकासकामांना आता नवी गती मिळेल, अशी आशा जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.






