जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताहाचे आयोजन
आशिष सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड; १३ ते २० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा समिती’ची स्थापना करण्यात आली असून. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात १३ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत ‘प्रबोधन सप्ताह’ साजरा करून बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.समितीची महत्त्वपूर्ण घोषणा ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे तसेच जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या सर्वानुमते या समिती जाहीर करण्यात आली.
समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी आशिष उत्तमराव सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी मनोज सोनवणे आणि महिला अध्यक्षपदी शुभांगी बिऱ्हाडे व ज्योती निंभोरे यांची निवड करण्यात आली आहे.
काय असणार प्रबोधन सप्ताहाचे स्वरूप?
जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल ते २० एप्रिल या काळात शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातील. यामध्ये प्रामुख्याने खालील कार्यक्रमांचा समावेश असेल:
शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि स्कॉलरशिप परीक्षांचे आयोजन.
समाज प्रबोधन: महामानवाचे कार्य आणि देशाप्रती असलेले त्यांचे योगदान यावर व्याख्याने.
सन्मान सोहळा: बौद्ध समाजातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.
मदत कार्य: गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
वस्तीगृह उपक्रम: १३ व १४ एप्रिल रोजी अनुसूचित जाती-जमाती वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कॉलरशिप कार्यक्रम व इतर स्पर्धा.
मूळ उद्देश: विचार शेवटच्या माणसापर्यंत नेणे
या समितीच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान कार्य, त्यांनी देशाला दिलेले संविधान आणि समाजाप्रती असलेले त्यांचे योगदान समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये वैचारिक जागृती होईल, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.






