
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २९ मार्च द्वापार युगात भगवान कृष्णांनी सामाजिक एक्याचे प्रतीक म्हणून गोपाळकाला केला. तोच गोपाळकाला सकल संत पंढरपुरात एकत्र येऊन चंद्रभागेच्या वाळवंटात करतात. आणि तोच गोपाळकाला शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने भाविकांना मिळतो.
आयुष्यात अन्नाचा कण आणि संतांचा क्षण कधी वाया घालवु नये. गोपाळकाला म्हणजे गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करणं आणि वाटण त्याचप्रमाणे देवाच्या भक्तांनी सोबत राहून आपले विचार एकत्र करावेत आणि त्यातूनच राष्ट्रहित समाजहित साधावे हाच खरा अध्यात्मिक गोपाळकाला आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे उत्कृष्ट कर्तुत्व आणि नेतृत्व आहेत म्हणूनच ते आपल्या गोपालांमध्ये रमतात.जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे ! आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी !! ह्या अभंगातून निरूपण करून ह भ प देवदत्त महाराज यांनी गोपाळकाल्याचे महत्त्व कीर्तनातून सांगितले. किर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली व त्याचा प्रसाद एकत्र करून भाविकांना देण्यात आला. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ या निमित्ताने घेतला.
जळगाव येथील दशरथ नगर येथे युवा दशरथ नगर मित्र मंडळ तर्फे आयोजित संगीतमय भव्य श्री शिव महापुराण कथेची सांगता गोपाळकाल्याच्या कीर्तनाने झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा दशरथ नगर मित्र मंडळ सदस्यांचे व रहीवासियांचे सहकार्य लाभले असे पवन कोळी यांनी सांगितले.





