हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत कुमार’ मनोज कुमार यांचे निधन
वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ४ एप्रिल २०२५ |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत कुमार’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून वय-संबंधित आजारांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.मनोज कुमार यांनी आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि देशभक्तीपर चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. ‘मेरे देश की धरती’ हे त्यांचे अजरामर गीत आजही ऐकताच त्यांची आठवण येते. त्यांच्या देशप्रेमाने प्रेरित सिनेमांमुळे चाहत्यांनी त्यांना ‘भारत कुमार’ ही सन्मानाची उपाधी दिली. त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखनातही आपली छाप पाडली होती.२४ जुलै १९३७ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील एबटाबाद येथे जन्मलेल्या मनोज कुमार यांनी ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडने एक दिग्गज कलाकार गमावला असून, त्यांची लोकप्रियता आणि वारसा कायम स्मरणात राहील.





