विधानपरिषद निवडणूक चौरंगी लढत अटळ…! रेश्मा काळेंची माघार नाहीच; अनिल चौधरींचे मोठे आव्हान

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा कुंदन काळे या देखील रिंगणात उतरल्यामुळे लढत चौरंगी होणार असल्याने यात जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून देणार्या विधानपरिषदेच्या जागेसाठी यंदा जळगावातून मोठी चुरस निर्माण झाली आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वात आधी मोर्चेबांधणी करत महायुतीसमोर आपले मोठे आव्हान उभे केले आहे.महाविकास आघाडीच्या वतीने जळगावचे शिवसेना-उबाठा पक्षाचे नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरला असतांना रात्री उशीरा भाजपची उमेदवारी नंदकिशोर महाजन यांना जाहीर करण्यात आली. तर उमेदवारी दाखल करतांना शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव येथील नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि भुसावळचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी अर्ज सादर केला होता. यात एकूण सोळा उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला. तर रेश्मा कुंदन काळे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महिला जिल्हाध्यक्ष सरिता कोल्हे, महानगराध्यक्ष कुंदन काळे देवदर्शन सहलीसाठी बाहेरगावी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याच नाहीत. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे आता विधानपरिषदेचा मुकाबला हा चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदकिशोर महाजन हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अन्य अपक्ष रेश्मा कुंदन काळे असा हा सामना होणार आहे. यात लक्षणीय बाब अशी की, रेश्मा काळे यांचा अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सरीता माळी-कोल्हे यांची देखील उपस्थिती होती. त्यांनी कोणत्याही स्थितीत आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले होते. रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही. यामुळे आता शिवसेनेची ताकद रेश्मा काळे यांच्या मागे उभी राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यांनी घेतली माघार
प्रवीण गंगाराम पाटील, निलेश सुरेश चौधरी, आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, सुनील नेमिदास जंगले, शेख जावेद इकबाल अब्दुल रशीद, सचिन चौधरी, दीपक काशिनाथ धांडे, निलेश गणेश झोपे, कलीम खान हैदर खान मणियार, हितेंद्र देशमुख, घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील या एकूण बारा उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. तर निवडणुकीच्या मैदानात चौघे उरले आहेत.






